“दादांच्या जाण्याने आमचं आयुष्य एका क्षणात बदललं; बारामतीसाठी खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला” – जय पवार भावूक
बारामती : “काही लोक म्हणतात की दादांच्या अपघात आम्ही विसरलो आहोत किंवा त्या प्रकरणातील चौकशी व कारवाईबाबत बोलत नाही. मात्र, जसे संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात त्या घटनेबाबत प्रश्न आहेत, तसेच प्रश्न आमच्याही मनात आहेत. कारण दादा हे केवळ एक नेते नव्हते, तर आमचे वडिल होते, आमचे सर्वकाही होते ” असे भावनिक उद्गार युवा नेते जय पवार यांनी काढले.
बारामती पंचायत समिती येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना जय पवार यांनी दादांच्या अपघातानंतरच्या काळातील भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, “२८ जानेवारी रोजी कुटुंबावर आलेल्या संकटाचा आणि त्यानंतरच्या प्रवासाचा उल्लेख केला. बोलताना त्यांच्या आवाजात दुःख, जबाबदारीची जाणीव आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी स्पष्टपणे जाणवत होती. तो दिवस आयुष्यभर विसरता येणार नाही. ज्या दिवशी बारामती आणि राज्यतल्या सर्वसामान्य नागरिकांचे आयुष्य बदलले, त्याच दिवशी माझे, वहिनींचे आणि पार्थ दादांचेही आयुष्य पूर्णपणे बदलले. आमच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या आल्या. आयुष्य इतक्या अचानकपणे बदलून जाईल, याची कधी कल्पनाही नव्हती. पण नियतीचा खेळ वेगळाच असतो.”
जय पवार पुढे म्हणाले की, “त्या घटनेनंतर विशेषतः बारामतीकरांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली होती. राज्याला आणि बारामतीलाही आधाराची गरज होती. त्यामुळे आम्ही सर्वांनी ठाम निर्णय घेतला की, आपल्या बारामतीकरांसाठी आणि राज्यातील जनतेसाठी खंबीरपणे उभे राहायचे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतः पुढे येऊन जबाबदारी स्वीकारणे हीच काळाची गरज होती.””त्या काळात केवळ आमच्या कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण बारामतीला एक मोठी पोकळी जाणवत होती. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते, मनात असंख्य प्रश्न होते आणि भविष्याबाबत अनिश्चितता होती. राज्यालाही आणि बारामतीकरांनाही आधाराची गरज होती. अशा वेळी आम्ही दुःखात बुडून न जाता स्वतःला सावरले. एकत्र बसलो आणि ठाम निर्णय घेतला की, वैयक्तिक वेदना बाजूला ठेवून जनतेसाठी उभे राहायचे.
त्यांच्या या भावनिक वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित भारावून गेले. दादांच्या आठवणींना उजाळा देताना जय पवार यांनी कुटुंबावर आलेल्या संकटाचा उल्लेख करत, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता पुढे वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त केला.
