कारवाई की केवळ दिखावा? बारामतीतील दोन हवालदारांच्या बदल्यांवर संशयाची छाया
बारामती : अवैध धंद्यांना अभय, वसुलीचे जाळे आणि बेकायदा संपत्तीच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या दोन हवालदारांवर करण्यात आलेली बदली ही खरोखरच शिस्तभंगाची कारवाई होती की केवळ कागदोपत्री औपचारिकता, अशी चर्चा बारामती शहरात सुरू झाली आहे.
यापूर्वी द केसरीने पोलीस प्रशासनातील कथित गैरप्रकार, अवैध धंद्यांशी असलेले संबंध आणि त्यातून उभारलेले आर्थिक साम्राज्य याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर संबंधित दोन्ही हवालदारांच्या बदल्यांचे आदेश निघाले. मात्र, बेकायदा “वैभव” कमावणारा आणि “गोरख” धंदा चालवणारा दोघांचीही बदली बारामतीतून बाहेर न होता तालुक्यातीलच दुसऱ्या पोलीस ठाण्यात करण्यात आल्याने या कारवाईच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या दोघांच्यामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याची बारामतीतून बदली झाली पण मात्र हे दोघं दोन तालुक्याच्या बाहेर जायला तयार नाहीत याचं कारण नेमकं काय असेल? वसुली साम्राज्य का गोरख धंद्यांचे नेटवर्क? हा सवाल मात्र कायम आहे
स्थानिक नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की, कार्यक्षेत्राच्या अगदी शेजारील पोलीस ठाण्यात बदली झाल्यामुळे जुने संपर्क, कथित वसुलीचे जाळे आणि अवैध व्यवहारांवर फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे ही बदली प्रत्यक्षात कारवाई नसून केवळ दिखावा असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
बर झाल्या प्रकारामध्ये अवैध वसुलीतून घेतलेली थार गाडी आणि राजाळ्यावरून येणारी नार हा विषय नेमका आहे तरी काय? याची चर्चा देखील चौकाचौकात रंगताना दिसत आहे
विशेष म्हणजे, संबंधित दोन्ही हवालदार गेल्या सुमारे १८ ते २० वर्षांपासून प्रामुख्याने बारामती आणि इंदापूर या दोन तालुक्यांमध्येच कार्यरत असल्याची चर्चा आहे. इतक्या दीर्घ काळात त्यांची या दोन तालुक्यांबाहेर बदली का झाली नाही, हा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.
पोलीस दलातील पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास टिकवायचा असेल, तर अशा प्रकरणांमध्ये केवळ नावालाच बदली न करता निष्पक्ष चौकशी आणि आवश्यक असल्यास कठोर प्रशासकीय कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
