अन्यथा स्वाभिमानी संघटना स्वबळावर विधानसभा लढविणार

बारामती : स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर विधानसभा लढणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी देत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून त्याला दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करावी या मागणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि 1 जुलै पासून पुसद येथून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती अभियान सुरु करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पत्रकारांना माहिती दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बारामतीत दोन दिवसीय राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती त्यानंतर शेट्टी यांनी पत्रकारांना माहिती दिली.
पुढे शेट्टी म्हणाले की, आज झालेल्या ठरावावर आम्ही सरकारकडे पाठपुरावा करणार असून जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही सरकार बरोबर जाऊ अन्यथा आम्ही स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगत महाविकास आघाडी की महायुती याबाबत तरी शेट्टी यांनी भूमिका स्पष्ट केली नाही.
तर आमच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत 15 ठराव करण्यात आले आहेत, ते पुढील प्रमाणे 1) शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी व वीजबिल माफी मिळावी,2) गाईच्या दुधाला लिटरमागे सात रुपये अनुदान मिळावे 3) पामतेल ब सोयाबीन पेंडीच्या आयातीवर 40 टक्के कर लावावा 4) कांदा निर्यातीवर शून्यटक्के कर असावा.5) उसाची एफआरपीची रक्कम एक रकमेत मिळावी 6) पाणीपट्टीत दहापट दरवाढ मागे घ्यावी 7) कृषीपंपांना मीटर बसविण्याचा निर्णय मागे घ्यावा 8) रासायनिक खताचे दर पूर्ववत करावे 9) पिकविम्याचे पैसे तातडीने शेतकऱ्यांना द्यावे 10) भूमी अधिग्रहण कायद्यात बदल करून पूर्वीप्रमाणे चौपट मोबदला द्यावा 11) शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना शैक्षणिक कर्जाला शासनाने हमी द्यावी व त्यांना बिनव्याजी कर्ज द्यावे 12) शेती साहित्याचा जीएसटी परतावा शेतकऱ्यांना द्यावा 13) वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान विमा कवचात घेऊन त्याची नुकसान भरपाई चौपट मिळावी 14) महिला बचत गटाची कर्जे माफ व्हावीत 15) उसाच्या वजन काट्यांना ऑनलाईन करून संगणक प्रणालीला जोडावे अश्या मागण्या घेऊन शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी संघटना अभियान राबविणार आहे.