पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 80 कोटी नागरिकांना दिवाळी गिफ्ट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना दिवाळी गिफ्ट जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी आणखी पाच वर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गरीब कुटुंबांना पुढील पाच वर्ष मोफत शिधा दिला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या छत्तीसगडमध्ये निवडणुकीचा प्रचार करत आहेत. यावेळी छत्तीसगड येथील दुर्गे येथे सभे दरम्यान बोलताना त्यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत शिधा योजना आणखी पाच वर्षांसाठी वाढवत असल्याची घोषणा केली.
या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरीब कुटुंबाना मोफत शिधा दिला जातो. ही योजना कोरोना काळात सुरु करण्यात आली होती, देशात लॉकडाऊन असल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते, अशावेळी गरिबांना दिलासा म्हणून त्यांना मोफत शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी येत्या डिसेंबरमध्ये संपणार होता. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर या योजनेचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत पाच किलो गहू, किंवा तांदूळ मोफत मिळते. केंद्र सरकारने ही योजना ३० जून २०२० मध्ये सुरु केली होती. आता ही योजना डिसेंबर २०२८ पर्यंत असणार आहे, साधारण देशातील 80 कोटी नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.