राज्यात कंत्राटी नोकर भरती तात्काळ बंद करावी .. संभाजी ब्रिगेडची मागणी
बारामती : राज्यात कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरती निर्णय तत्काळ रद्द करावा असे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांना देण्यात आले आहे.
तरुण बेरोजगारांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी नोकरी मिळाली पाहिजे, असा शासनाचा उद्देश असताना देखील राज्यात वेगवेगळ्या विभागा अंतर्गत तीन लाख पदे सरकारी विभागांतर्गत रिक्त असताना कंत्राटी पद्धतीने तहसीलदार व इतर पदे भरणे हे तरुण बेरोजगार मुला-मुलींच्या भविष्याशी व आयुष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. सदर प्रक्रिया तत्काळ बंद करावी. अन्यथा महाराष्ट्रात बेरोजगार युवकांचा प्रचंड उद्रेक होऊ शकतो. असे निवेदनात म्हटले आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार, संभाजी ब्रिगेड कृषी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतिलाल काळकुटे, जिल्हा सरचिटणीस रमेश चव्हाण, संभाजी ब्रिगेड बारामती तालुकाध्यक्ष तुषार तुपे, इंदापूर तालुका उपाध्यक्ष विनोद बोबडे, पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अमर फुके, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेड तालुकाध्यक्ष जावेद शेख आदी उपस्थित होते.
