रोहित पवारांच्या कंपनीवर मध्यरात्री दोन वाजता शासनाची कारवाई.

बारामती : राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून, तसेच द्वेष मनात ठेवून मध्यरात्री दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांच्या एका कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली असल्याचे खुद्द आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
तर पवार यांनी, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत, मात्र अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे. हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही. असेही त्यांनी व्यक्त केले आहे.
तर आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त ‘गिफ्ट’ दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच ‘रिटर्न गिफ्ट’ देईल, ही खात्री पवारांनी व्यक्त केली आहे.
असो!
तर सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन महिने सुस्ती दाखवणारी शासकीय यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवत आहेत याचा मात्र नक्कीच आनंद आहे. या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नसून. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील असेही आ. रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
तर यामध्ये कोणत्या कंपनीवर काय कारवाई केली, आणि कोणत्या कारणाने कारवाई केली हे मात्र अद्याप कळू शकले नाही.